Friday, 14 December 2018

चहा दिन

चहा
चहा फक्त चहा च नसतो ,
कोणी चहा घेता का विचारणे म्हणजे फक्त चहापावडर, साखर,दूध,जमले तर आले(अद्रक) घालून उकळून चहा देणे नसते.
तर ते एक विचारणे असते ,बसून माझ्याशी काही साखरेसारख्या गोड,चहा पत्ती सारख्या कडवट, आल्यासारखा मसालेदार आठवणी /प्रसंग सांगणार /ऐकणार का ?
काही अनुभव सांगून काही नवीन आशा निर्माण करणार का ?
एक कप दोघांत घेताना होईल का जवळीक निर्माण? जी गोष्ट कोणाला सांगितली नाही ती सांगण्याचा मिळेल का विश्वास ?
सांगायचे असे काही जे कोणाला आपल्या नातेवाईकांना देखील नसते सांगितलेले ,कुठून तरी उर्मी येते समोरच्याला पाहून अन आपसूक विचारले जाते चहा घेणार का ?
भंगलेले स्वप्न , त्यावर चढलेली जळमटे उडवून टाकायची असतात कधी एकत्र चहा पिता पिता !
चहाच्या ठेल्यावर तर दोन अनोळखी व्यक्ती कधी कधी इतके बोलून जातात की ते ओळखीत ही बोलले जात नाही ,अन त्या चहाच्या वाफेबरोबर त्याच्या कोंडलेल्या मनातली वाफ देखील निघून जाते ,आणि चहाने तरतरी आली असे म्हटले जाते 🙂


त्यामुळेच कोणी जर म्हटले तर चहा घेणार का ?तर अगदीच उडवून नको लावूत,
ऐका ,सांगा सुखदुःखाच्या गोष्टी !




जागतिक चहा दिनाच्या शुभेच्छा!

अर्चना कुलकर्णी
१५/१२/२०१८

Tuesday, 20 November 2018

पैसे साठवलेले

मध्यमवर्गीय घरात पैसे साठवणे म्हणजे खरोखर पैसे ,रुपये नव्हे साठवायचे . लहानपणापासून बघत होते ,नेमके कोणी तरी महिना अखेरीस आजारी पडे किंवा कोणी पाहुणे येत, मग निघत आई ने एक एक करून साठवलेले पैसे बाहेर.एका छोट्या पितळी डब्यात आई पैसे ठेवत असे.
आज ही ते दिवस आठवले की डोळ्यात पाणी येते,पण त्यातून च कुठे तरी आपण पैसे साठवायला हवे असे संस्कार नकळत मनावर झाले.

Thursday, 11 October 2018

प्रिये चहा

 प्रिये चहा, 

प्रिये चहा 

रात्रीचा कलह विसरोनी, 

शरण तुज आलो हा

पाणी हे उकळवत 

आलं ते घाली किसून 

चहा पत्ती ने रंग येत, 

दरवळला गंध पहा....... 

धार दुधाची वर ओतत, 

चिमूटभर साखर घालत 

गाळतो हा चहा मगात 

बिस्किटासवे 

आणिला तुज निकट 

राग सोड सखे बिकट 

सदा हसत रहा.... 

अर्चना 

12.02/2018

Sunday, 7 October 2018

Asech

कोण जाणे करील इथे कोण-कधी कुणाचा घात
का धरू नये, म्हणते मी, स्वतःच स्वतःचा हात.
जगाला वाकुल्या दाखवून करावी पराभवावर मात
कशाला बसावं कुढत,  या क्षणभंगूर मायावी जगात ?
अर्चना
8/10/2017

Saturday, 29 September 2018

Walk वेळी

 सकाळी walk ला जाण्याच्या रस्त्यावर पाहिले न सहज वाटले....

झाले असता काम आपुले 

देव ही रस्त्यावर टाकले,

नव्या घरात जुन्यास न जागा

की नसे आला प्रत्यय मानाजोगा ?,

कालपर्यंत वाढवी घराची शोभा

तो च का आज रस्त्यावर उभा?,

रस्ता असे असा खास

वहाने राहती उभी हमखास,

जिथे लोकांची खूप वर्दळ

पण घंटागाडीची नसे पळापळ,

अहा ,मी किती थोर !

कचऱ्यात टाकल्याचा नसे जीवास घोर

जाता येता पाहती सान थोर,

देव ठेवले रस्त्यावर !


अर्चना कुलकर्णी. नाशिक 

29/09/2018 

Tuesday, 18 September 2018

Nostalgic about pooja

हरतालिका
पूजा ,उपास का करायचा ?हे कळण्याआधीच उपास सुरू झाला ,ते आईमुळे ! ती खूप देवभक्त होती , उपास सतत च असत ,पण पूजा खूप नसत! दररोज च्या देवाची पूजा तर मुलाचे सर्व आटोपून झाले की देव ! तोवर ती फक्त चहा वर असे हे देखील नंतर उमजू लागले.
हरतालिका व वटपौर्णिमा ह्या दोन्ही दिवशी मात्र अगदी साग्रसंगीत ,षोडपचारे पूजा !
हरतालिकेच्या आदल्या दिवशी च पत्री गोळा करून आम्ही मुले आणत असू. तेरडा ,आघाडा, डाळिंब,सीताफळ , प्राजक्त, ,अनंत , अशी अनेक पत्री जमा करत.कोणतीही पाने 5 पेक्षा जास्त आणू नका असे ती सांगे.रात्री 12 पर्यंत जागरण , त्यात ल्या मटार करंज्या अजून ही आठवतात.आई मात्र
रात्री सर्व पत्री  नीट करून ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवत असे!
सकाळी लवकर उठून ,जस्वाद ,प्राजक्त ,गोकर्ण तसे च इतर काही फुले आम्ही आणत असू.
इमारतीमधील इतर ही 5/6 बायका जमत, आई पूजा करता करता च त्यांना देखील सांगे , व एका चौरंगावर सर्व जणी पूजा करत.दिवसभर फक्त पाणी अथवा शहाळ्याचे पाणी!
पण त्या पूजेचा उत्साह इतका की नकळत च उपास सुरू झाले , दिवसभर उपास करायचा ,संध्याकाळी उपासाचे पदार्थ☺ह्यात चैन !
आईचा उपसाचा स्टॅमिना जबरदस्त होता , ती फक्त शहाळ्याचे पाणी!
लग्नानंतर काही वर्षे आई कडे जाऊन पूजा केली, मग परदेशी जाणे झाले ,घरातच देवाला नमस्कार ! मुले लहान,ऑफिस ची घाई ह्या सर्वात घड्याळाकडे बघत पूजा करणे मला मान्य नाही झाले , उपास करत असे पण पूजा मांडणे बंद झाले।
त्यात काही वेळेस विकत आणलेली पत्री म्हणजे निव्वळ कचरा ,फुले शिळी हे बघून पूजा करणे बंद केले हे चांगले च झाले असे वाटायचे!
आज बरेच वर्षांनी पूजा केली , दारात उमललेली फुले , बागेतील पत्री गोळा करताना खूप मस्त वाटले.
😊परत लहान झाल्यासारखे च। मग तशी च पूजा केली.
देवपूजेने काही होत नाही इतपत मनाला माहीत असताना देखील पूजा करताना जे प्रसन्न वाटते ,त्याची तुलना कशाची च होत नाही!



Friday, 7 September 2018

असा ही अनुभव

अनुभव
गेल्या आठवड्यात औरंगाबाद येथील घृष्णेश्वर मंदिरात जाण्याचा योग आला.
वेळ ११/ ११.३० ची असल्याने मंदिरात फारशी गर्दी नव्हती.
दर्शन घेऊन बाहेर पडलो तर एक छोटा मुलगा गंध लावून घ्या असा आग्रह करत होता.
आम्ही नाही ,नको रे असे म्हटले.तर म्हणाला ते पैसे मला शिकायला उपयोगी पडतील. अर्थात मन द्रवले, म्हटले हम्म बघते!लगेच म्हणाला हवे तर पेन व वह्या घेऊन द्या ,हो म्हणून चपला-बूट घालण्याकरिता आम्ही दोघे तिथे गेलो. तर तिथे बसणाऱ्या आजी म्हणाल्या , ओ हा मुलगा शिकत नाही.उगाच इथे तिथे भटकतो.
त्या मुलाला विचारले, काय रे कितवीला आहेस?तर म्हणाला आहे मी पाचवी ला !
सांग बरे ,मराठीत पहिला धडा कोणता शिकवला ?
अ अ ....
बरे ,मग तू आता कोणता धडा वाचलास ?
काही उत्तर नाही.
का रे अभ्यास नाही करत का ?
तर गेला पळून !
म्हणजे आपल्या भावनेचा कसा उपयोग करून घेत असतात!
आपल्याला वाटते,खरं  देवावर पैसे खर्चण्यापेक्षा कोणाच्या शिक्षणा ला उपयोग होईल!


अर्चना कुलकर्णी
12 जानेवारी 2018


Thursday, 2 August 2018

माझा पहिला विमान प्रवास

 कधीचं ठरवलं होतं मी की माझ्या पहिल्या विमान प्रवासाबद्दल लिहीन म्हणुन आज मुहुर्त उगवला 

 29 वर्षापूर्वी परदेशी प्रवास सगळ्यांनाच एक अप्रुप असायचं तेव्हा आजच्यासारखे tour ला जात नसत परदेशात . त्यातुन मी एकटी जाणार ते पण पावणे दोन वर्षाच्या मुलाला घेऊन म्हंटल्यावर आईबाबांच्या पोटात गोळाच आला होता कारण परदेशीं आमच्या घरातून जाणारी मी पहिलीच . मस्कत ला महेश आधी गेले होते . मग आम्हाला दोघांना visa पाठवून,कसे यायचे सगळं समजावुन सांगितलं होतं एअर पोर्टवर गेल्यापासुन विमानात बसेपर्यंत काय काय असतं ते . आणि तिथे उतरल्यावरपण काय असेल ते . मी जमेल तेवढं सगळं लक्षात ठेवलं होतं . आणि पॅकींग करत होते.फोन देखील नव्हता घरी, शेजारी काकूंकडे फोन यायचा महेशचा. मग त्या बोलण्यातून काय मिळते काय नाही हे लक्षात ठेवत खरेदी करत होते...

किती करावे शॉपिंग? बॅग भरली ती 30kg झाली, जणू काही तिथे मिळतच नाही अशा तर्हेने.  साबुदाणा खिचडी हा weak पॉईंट तिथे साबुदाणा मोठा मिळत नाही म्हणून 2किलो साबुदाणे च होते 😄

दाण्याचे कूट, अनारसे पीठ, चकली चिवडा, लोणची, कुरडया असे असंख्य पदार्थ, तिघांचे कपडे आम्ही घेतलेले, नातेवाईकांनी प्रेमाने दिलेले असे भरपूर 😄

एक केबिन बॅग ज्यात जास्तीचे कपडे का तर कधी हि बॅग हरवते, यायला उशीर होतो म्हणून त्यात दोघांचे चार दिवसाचे कपडे, अळूवडी, खरवस, पुरणपोळी खास आपले तयार पदार्थ त्याचे वजन 12 किलो.  पर्स मध्ये पासपोर्ट ठेव व पैसे, डॉलर ठेव इतर काही नको तरी त्यात अतिश,मुलाकरीता खीर, शिरा, तूप साखर पोळी, पाणी , दूध असे पदार्थ आणि प्रवास किती तासाचा तर 2तासाचा, तो हि पहाटेच पण सारे खाणे सोबत .. 

जसे जसे जाण्याचे दिवस जवळ येत होते तशी एक अनामिक भीती वाटत होती . 1वर्षानंतर भेटणार हा आनंद, कसं असेल मस्कत? ही उत्सुकता , आईबाबा सगळेच काही महीने तरी भेटणार नाही याचे दु:ख सगळंच एकत्र झालं होतं........


               2ऑगस्ट 1992 पहाटे 3चे माझे फ्लाईट होते तीन तास आधी एअर पोर्टला पोहोचायला हवे असा नियम होता,

पावसाळा उशीर नको व्हायला म्हणत आम्ही रात्री 10.30,10.45ला च पोहोचलो. एक तासभर सर्वांशी गप्पा मारून सगळ्यांचा निरोप घेउन मी चेकइन काउंटरकडे गेले, front सिटसाठी त्यांना विनंती केली मुलगा लहान पाहून ती त्यांनी लगेच मान्य केली . आता बॅग चे वजन.. 20 किलो दोन चालत होत्या,दोन तिकिटे होती, परत सगळे समजावून सांगितले की तो कशी बॅग उचलणार म्हणून एकच बॅग केलीय नशिबाने जास्त कटकट झाली नाही.  इतर formalities पार पडल्या बोर्डींग पास हातात आला तो नीट ठेवून सिक्युरिटी चेकइन करुन कडेवर पेंगुळलेला अतिश,12 किलोची hand बॅग, पर्स, पावसाळ्यामुळे छत्री हे सगळे सांभाळत मी गेट शोधायला निघाले सगळ्या पाट्या बघत बघत गेटजवळ येउन पोहोचले . जरा बसावे तर आजूबाजूला केरळी लोक किंवा मुस्लिम लोक च दिसत होते पण खरंच ते चांगले होते, दीदी म्हणत माझ्या व mulakarita म्हणून दोन खुर्च्या रिकाम्या करून दिल्या.आता तर अतिश झोपलाच पूर्ण आणि अशातच बोर्डींग सुरु झाल्याची announcement झाली मी त्याला व पर्स सावरत उठले आणि बाजूच्या माणसाने माझी बॅग उचलून घेतली. आपली बॅग कोणाला देऊ नकोस कोणाची बॅग तू घेऊ नकोस, डोक्यात आदळत होते पण नाईलाज होता, त्या माणसापाठोपाठ गेटमधुन आत गेले माझ्या पहील्या  विमान प्रवासासाठी.


          Front seat म्हणजे पहिलीच सीट असेल असा भ्रम दूर झाला .आधी first क्लास business क्लास मग इकॉनॉमी त्या छोट्या मार्गीकेतून मुलाला कडेवर घेऊन चालणे एक कसरत करत सीट पाशी पोचले.स्वत:भोवती बेल्ट बांधणे आणि सुरक्षतिततेच्या सगळ्या सुचना लक्षपूर्वक ऐकत होते . विमान झेपावण्यासाठी हळुहळु पुढे सरकत होतं मग थांबुन एकदम वेगात ते आकाशात झेपावण्यासाठी जसे निघाले तशी छातीतली धडधडपण तितक्याच वेगाने वाढली कानाला दडे बसले . थोड्यावेळाने विमानाबरोबरच मी पण शांत झाले. आता माझं बाहेर लक्ष गेलं चांदणं इतकं जवळुन कधीच पाहीलं नसल्याने त्यात मी हरवुन गेले त्यावेळी मी एक लहान मुलं झाले होते कित्ती नवल वाटत होतं सगळ्याचं . ते ढगांचे पुंजके अगदी कापुस पिंजुन ठेवल्यासारखेच भासत होते. मग मात्र नंतर हे सगळं दिसेनासे झाले . भुकेची जाणीव होतच होती की हवाई सुंदरीने जेवण पुढे आणुन ठेवलं . जेवण झालं . दिवसभराच्या धावपळीने खरेतर खुप थकले होते पण झोप काही येईना . शेवटी तशीच डोळे मिटुन बसले . तेवढ्यात Announcement झाली थोड्याच वेळात मस्कत एअरपोर्टवर लॅंड होणार असल्याची आणि मी शटर उघडून पाहिले तर बाहेर उजाडत होते . हळूहळू jerk देऊन विमान थांबले,विमानातुन समानासहित बाहेर आले. एअर पोर्ट फार सुंदर होतं. आता कोणत्या बेल्ट वर ते पाहून मी त्या बेल्टजवळ पोचले, कडेवर मुलाला घेऊन त्या बेल्टवरची बॅग मी कशी उचलणार असा विचार येतोय तोवर माझी बॅग बेल्टवरून पुढे जाऊ लागली, ती परत येईल वगैरे काही माहीत नव्हतेच भीतीनेच ओरडले my bag, my bag.. एक arabic माणूस आला, खुणेनेच विचारले कोणती? Large असे म्हणतं हाताने त्याला bag दाखवली.  त्याने एका झटक्यात ती bag खाली घेतली, मला तिथे च उभे राहायला सांगून trolley घेऊन आला, trolley वर मोठी bag ठेवून बाजूला hand bag ठेवायला सांगितले, सारे खुणेच्या भाषेत त्याला इंग्लिश येत नव्हते. त्याच्या मागोमाग चालत इंमिगरेशन काउंटर ला पोचले, भली मोठी रांग होती. कसे माहित नाही पण तिथल्या ऑफिसर ने मला पुढे बोलावले, ममा first असे म्हणत माझा passport घेऊन योग्य ते शिक्के मारून दोन्ही पासपोर्ट परत दिले, you go.   झाले काम मनात म्हणून सुस्कारा सोडला. माझी bag ट्रॉली घेऊन तो माणूस देखील बाहेर आला. समोरून महेश चा हात हलवताना दिसला आणि माझा जीव भांड्यात पडून आनंद गगनात पोचला...

सामान ढकलत आणनाऱ्या माणसाला मी thankyou म्हणतेय तर तो शुक्रन.. Money money म्हणू लागला.   आनंदाने मी त्याला 50$ दिले... नंतर कित्येक महिने 1000च्या वर रुपये आपण टिप दिली, जेंव्हा माझा पगार 3000रुपये होता. हे आठवून हसत होते.  असा माझा पहिलावाहिला विमान प्रवास. 😄

अर्चना कुलकर्णी...

Monday, 18 June 2018

आई आप्पा

मदर्स डे, फादर्स डे हल्ली मुलं मोठ्या हौसेने साजरे करतात.

खूप आनंद होतो आपण उत्सवमूर्ती असतो तेव्हा.    

पण अगदी खरं सांगायचं तर,  मी स्वतःच्या संसारात मग्न असताना  कोणालााही आईवडिलांची आठवण फारशी येतच नव्हती का?.. ! आपल्याच विश्वात आपण इतके बुडून गेलेले होते की दूर राहाणा-या आईवडिलांवर आपलं मनापासून प्रेम असलं, तरीही आपण त्यांच्या भावना जाणून घेऊ शकले नाही...त्यांना पुुरेेसा वेळ देऊ शकत नाही.... आपल्याला भेटण्यासाठी आसुसलेलं त्यांचं मन....आपला आवाज ऐकण्यासाठी आतुरलेले त्यांचे कान..यातलं काहीच आपल्या लक्षातही येत नाही...आणि ते जेव्हा कायमचे या दुनियेतून निघून जातात ना, तेव्हा आपल्याला त्यांचं महत्व कळतं...पण तेव्हा खूप उशीर होऊन गेलेला असतो...आधी त्यांनी मारलेल्या अबोल हाका,

दुनियेच्या कोलाहलात आपल्याला ऐकू येत नाहीत आणि आता ते आपल्या हाकांच्या

पल्याड निघून गेलेले असतात...!


आता आपल्याला त्यांची उणीव 

अगदी मनापासून जाणवते आणि

वाटतं....गेले ते दिन गेले....!

          

आठवतंय मला-

मी दर आठवड्याला,

तुम्हा दोघांना भेटायला यायचे. 

मला पाहून तुमचे अधू डोळे,

आनंदाने चमकायचे. 

आठवडाभरात घडलेलं सारं,मी

तुम्हाला रंगवून रंगवून सांगायचे. 

आईने आठवणीने आठवड्यात केलेला

विशेष खाऊ द्यायचा.

प्रत्येक वेळेस वेगळाच

मग अप्पानी विकत आणलेले फरसाण

किंवा शंकरपाळी..  

माझ्या गप्पांनी तुम्ही खुलायचात,

आप्पाना माझ्या सोबतीने बाहेर जावे वाटे..

पण कधी कधी वेळेअभावी मी टाळत असे.. 

कधी  महत्वाचे सल्लेही द्यायचात. 

तासाभराने मी निघाले,

की तुम्ही नाराज व्हायचात. 

' बस ना अजून थोडा वेळ ' ....

मला आग्रह करायचात .

मी जरा बसायचे ..

पुन्हा घराच्या ओढीने उठायचे..!

बसने घरी जाईस्तो उशीर होईल म्हणायचे 

मग मला निरोप देण्यासाठी

तुमचं गॅलरीत येणं ,

मी दृष्टीआड होईपर्यंत .

हात हलवत उभे रहाणे 

एकदा का तुम्ही नजरेआड झालात,की

माझ्या पावलांचा वेग वाढायचा.

माझा नवरा..... माझी मुलं 

माझा संसार...स्वयंपाक 

मला खुणावत असायचा   

 

पुढच्याच क्षणी ,मी

माझ्या विश्वात गुरफटलेली. 

तुमची अवघी दुनिया मात्र, जणू 

माझ्यातच एकवटलेली..!


खरं तर माझ्याही हृदयात

तुम्हाला महत्वाचं स्थान होतं,

तुमच्या ''असण्याला "' खूप खूप 

महत्त्व होतं...!


तरीही मी माझ्याच नादात 

धावत राहिले,

तुमच्या नजरेतलं आर्जव,

दिसत असून नाकारत राहिले...

ज्यांनी मला जन्म दिला,

सक्षम अस्तित्व दिलं,त्यांचंच

अस्तित्व मी गृहित धरत राहिले. 

 हे काय हक्काचेच...!

आहेतच कधीही माझ्यासाठी !

ह्यांच्यासाठी वेगळे काही करावे

हे जाणवलेच नाही...

तुमच्यासाठीही मी तितकीच 

' हक्काची'  असले पाहिजे ,

हे सत्य मात्र सदैव 

नजरेआड करत राहिले...!


तुम्हा दोघांच्या अचानक जाण्याने 

हे सारं संपूनच गेलं---


आता कोणीच माझी आतुरतेने 

वाट पाहात नाही,

आतुरत्या नजरेने माझं स्वागत 

करत नाही. 

मी निघाले की थांबायचा आग्रह 

होत नाही,

जाताना मागे वळून पाहिलं 

तर गॅलरीत कोणी दिसत नाही....


आता वाटतं......

 पुन्हा ते दिवस यावेत

पुन्हा तुम्ही माझ्या वाटेकडे 

डोळे लावावे,

मला पाहून तुमचे चेहरे 

प्रसन्नतेने उजळावेत,

मला आग्रह करणारे दोन शब्द 

कानांवर पडावेत....


आता तुमच्या हाकेला मी

लागलीच ओ देईन ग

आता तुम्ही म्हटलंत तर मी ,

अगदी नक्की थांबेन ग  ......!


घरी परतायला उशीर होत असला ,तरीही....

माझी वेळेची गणितं, कोलमडत 

असली , तरीही...

पण मला ठाऊक आहे आता हे कधीच घडणार नाही.. 

पण तुमची आठवण कधीच कमी होणार नाही....      

 

       अर्चना...  


18/6/18

Sunday, 25 February 2018

दुःख

श्रीदेवी च्या निधनाचे दुःख व्हावे ,इतकी मी तिची चाहती नाही.
तरिही मनाला चैन पडत नाही, याचे कारण 54 व्या वर्षी म्हणजे च आज च्या दृष्टीने खूप च अकाली मृत्यू !
तो ही अपघाती नाही तर हृदय विकाराने, कसली ही पूर्व सूचना न देता!
आयुष्य हे असे च आहे, आपण नेहमी उद्या असे करू, पुढील वर्षी करू म्हणतो , पण शाश्वती काय आपल्या पुढच्या श्वासाची अन आपण खूप काही ठरचतो.
ह्याच जाणिवेने मन उदास झाले आहे.
श्रीदेवी करिता खूप वाईट वाटले,तिच्या ही मुलीकडून अपेक्षा असतील ,त्या पूर्ण होतील किंवा नाही हे बघायला ती नाही.
तिचे आवडलेले चित्रपट म्हटले तर सदमा, जुदाई, mr इंडिया,लमहें, व इंग्लिश विंग्लिश

सदमा मधील अभिनय विशेष आवडलेला!
मनापासून श्रद्धांजली!
अर्चना
2

Friday, 2 February 2018

प्रिय आप्पा

प्रिय आप्पा,
तुम्हाला जाऊन आज 3 वर्षे झाली, पण एक ही दिवस असा गेला नाही की तुमची आठवण झाली नाही.
मी आज जे काही आहे, ते सर्व गुण तुमच्यातील आहेत असे मला वाटते.
वाचन, लिखाण , संभाषण ह्या तिन्ही गोष्टीत तुम्ही प्रवीण होतात , मी अजून ही प्रयत्न च करत असते.
चांगल्या गोष्टींना दाद देणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे, खूप मित्रपरिवार पण फक्त कौतुकाकरिता नाही तर पटले नाही तर वाद घालणे सर्व च गोष्टींची आठवण येते.
शुद्ध मराठी किंवा उत्तम इंग्लिश ही सुदधा तुमची खासियत !
आज देखील असे वाटते की आप्पा असे बोलले असते /असे वागले असते.
गेल्या आठवड्यात प्रदर्शन बघायला गेलं होते.
वेगवेगळ्या गावातून आलेल्या वेगवेगळ्या वस्तू /खाद्यपदार्थ विकायला होते.
कवठाची बर्फी घेताना तर खूप च आठवण झाली.
असे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला खायची आवड होती, तर आई ला तयार करण्याची.
कसे केले असेल असे म्हणून स्वतः करायला बघायची.
टेंडर कोकोनट icecream तिने घरी बनवले ते बघून मी चाट झाले होते, त्यानंतर तिने जांभळाचे icecream देखील बनवले होते,
आप्पा तुम्ही इतक्या लवकर जाल असे वाटले च नव्हते, खूप काही बोलायचे होते .
तुम्हाला घेऊन खूप फिरायचे होते ते राहून च गेले.
माहीत नाही पुनर्जन्म असतो की नाही , पण असला च तर तुम्ही च माझे आई वडील असू द्या.
तुमच्या आधाराची गरज वाटते ,तेव्हा डोळ्यातले अश्रू अनावर होतात , पण त्यांना ही आवर घालायला शिकवलंय!
तुम्ही जरी दूर गेलात अदृश्य रूपाने जवळ च आहात असे च वाटते नेहमी !
आमच्या सुखासाठी नेहमी कष्टात राहिलात , पण नंतर हवे ते सुख काही दिले का तुम्हाला ?
मुलगी असली तरी जिद्द सोडायची नाही हे तुमचे सांगणे, पण मुलगी असल्यामुळे च दूर होते का तुमच्यापासून?
आयुष्यभर जिद्दीने जगलात,
15 दिवसांच्या लढाईनंतर  मृत्यूपूढे मात्र हात टेकले.
कधी कौतुकाची थाप पडली की मला तुमची उणीव जाणवते,
काळ हे औषध आहे ,असे म्हणतात ,पण सगळे विसरता येईल का ?
मला आठवणे शक्य नाही, पण आई ने अनेकदा सांगितलेले , ७व्या महिन्यापासून रांगत येऊन अप्पांच्या पानातील वरण भात खात असे,
पहिलीत असताना सकाळ ची शाळा तुम्ही सोडायला येत , कधी 10 पैशाचे गोल कॅडबरी तर कधी छोटे बटर (लोणी) ,पण शाळेला उशीर होतोय असे वाटले तर आधी धावत शाळेत जा, उद्या घेऊ असे सांगणे,
नंतर शाळेत जशा स्पर्ध्या असतील तशा प्रत्येकात भाग घे असे सांगणे.
वक्तृत्व स्पर्धेत , हस्ताक्षर स्पर्धेत बक्षीस मिळाल्यावर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद!
नेहमी मिळवत राहा असे म्हणणे सर्व सर्व मेमरी त फिट्ट आहे.
त्यामुळे असे विसरणे शक्य च नाही, कधी कधी जबाबदऱ्यांच्या ओझ्याखाली दूर ढकलल्या जातात, कधी त्या आठवणी च मार्ग दाखवतात.
मागे राहणारे पळ भर हाय हाय करणारे नसतात, काही जण आपली ही जखम आपल्यासोबत बाळगून असतात.ही पोकळी विसरू शकत नाही ,
आणि जाताना ह्या आठवणी घेऊन जातील.

आप्पा मला तुमची खूप आठवण येते.
😥
31/01/2018

Sunday, 14 January 2018

तिळगूळ

तिळगुळ
आज सहज च आठवले,
मोबाईल तर अस्तित्वात नव्हतेच पण साधे फोनही सर्वांकडे नव्हते.
जानेवारी सुरु झाला की रस्त्यावर कुठेतरी तुरळक दुकान दिसायची व  स्टेशनरीच्या दुकानात कार्ड यायची.
मग छोट्या प्लास्टिक पिशव्यात तिळगुळ भरून मेणबत्तीने चिटकवून कार्डला स्टेपल करून आप्पा सर्व नातेवाईकांना  पाकीट तयार करून पोस्टाने पाठवून द्यायचे.
काही नुसती पाकीट यायची त्यात तिळगुळ आणि पत्र.अप्पांची ही सवय आणि त्याची आठवण ,ते गेल्यावर अनेकांनी काढली.
कारण ही तसे च होते, अप्पा 16 जानेवारी ला कोमात गेले आणि त्याच वर्षी फक्त कोणाला ग्रीटिंग पाठवले नव्हते.
हाताने लिहिलेल्या शब्दांना स्पर्श असायचा आणि सुगंध असतो, नुसता शाईचा नाहीतर लिहिणाऱ्या माणसांच्या भावना, सदिच्छा यांचा !


पाकिटातून आलेले दोन चार दाणे जेव्हा माझ्या हातावर पडले तेव्हा  लग्नानंतर ची पहिली संक्रांत असल्याने ,अप्पांच्या दोन च ओळींनी डोळ्यात टचकन पाणी आले.एका च शहरात होतो, संक्रांत सण म्हणून सारे येणार देखील होते , तरी अप्पानी आठवणीने मला देखील तिळगुळ पाठवला होता पत्राने.त्या पत्रातल्या अक्षरावरून हात फिरवला तरी मायेच्या माणसांच्या हाताचा स्पर्श जाणवला.

कितीही चांगले टाईप वापरून , रंग ,फोटोशॉप वापरून तयार केलेले मेसेज ढिगानं येताहेत सोशल मिडीयावर पण त्या थरथरत्या हातानी लिहिलेल्या " काळजी घे " ची सर कशाला नाही.

आता अस पत्र हाताने कधी कुणाला लिहून पाठवल होत शेवटी हेही आठवत नाही. हाताने लिहिणं थांबलंय तर पत्र लांबची गोष्ट.

हा फोटो न शुभेच्छा मेसेजचा पूर कितीही आला तरी काहीसा कोरडा वाटतोय.
बदल होत राहतात , बदल होण एवढच फक्त चिरंतन आहे हेही कबूल पण असे दिवस काहीतरी जुन्या आठवणी चाळवून जातात न आतून सगळ ढवळून जातात.

तिळगुळ घ्या गोड बोला , बोलण्यासाठी वेळ काढा !
संवाद असू द्या स्नेह असू द्या !!
अर्चना
14/1/2018