Friday, 24 February 2012

प्रिय सखीस ,

आज ची संध्याकाळ कलंडत आली

अन सखे मला तुझी आठवण आली !
काही चूक नसताना ,तू मला सोडून गेलीस ,
कारण सांगायच्या हि फंदात पडली नाहीस ,
जाताना अशी काही जखम दिलीस
पहिल्या अपयशाची तू निशाणी झालीस !
आज हि फिरताना वेडे मन आशेने पाहते

नजर हि कायम तुलाच खिडकीत शोधते !
आठवेल कधी तरी तुला हि सारे काही
पण कदाचित तेव्हा वेळच मिळणार नाही !
अर्चना ........

आनंदवन -एक अविस्मरणीय दिवस !

मी परवा आनंदवन इथे जावून आले . तिथली भेट म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव ...
आपल्याकडे  सर्व  काही  आहे , तरी  आपण  फार  छोट्या  गोष्टीं करता  रडत  राहतो ,

कधी  बोलून  तर  कधी  मनात ..खंतावतो

पण  ज्या  लोकांना  काही  अपंगत्व  आहे , किंवा  रोग  झाला  आहे  म्हणून  घरचे  सुद्धा  विचारत  नाहीत  ..... त्या  लोकांनी  आज  एक  स्वयंपूर्ण  गाव  निर्माण  केला  आहे . केवळ महारोग झाला आहे म्हणून आपले नातेवाईक विचारत नाहीत , आणि मग इथे यावे लागते , . त्या मागे घेतलेले बाबा आमटे यांचे अपार श्रम आपल्याला वेगळा विचार करायला भाग पाडतात.
एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होवून बाबा आमटे त्यांच्या पत्नी साधना ताई , त्यांची  दोन्ही मुलगे - विकास आणि प्रकाश आणि आता नातवंडे सर्व परिवार केवळ धन्य आणि धन्य ...
आम्ही आनंदवन इथे सकाळी ७ ला पोचलो ,तेव्हा तिथे रस्ते झाडणे काम सुरु होते. प्रत्येक ठिकाणी मराठीत पाट्या लावलेल्या होत्या ,त्यामुळे कार्यालय शोधायला वेळ लागला नाही.

तिथे शिरतानाच जाणवत होते की आनंद वन मधील  स्वच्छता केवळ वरवरची वाटत नाही तर ती त्यांच्या अंगात पूर्णपणे भिनली आहे .

आनंद वनात फेरफटका मारायला सुरुवात केली,आमच्या बरोबर इथले कार्यकर्ते श्री .प्रभू स्वतः होते.
आमचे स्वागत करायला भाजी पाला ,फुले ,फळे सर्व काही हजर होते. कोबी,वांगी,मिरची,वाल,चवळी वेगवेगळी भाजी इथे लावली जाते ,जी इथे जेवणात वापरली जाते ,जास्तीची भाजी गावात नेवून विकली जाते.भाजी व फळांची लगडलेली  झाडे बघून जे समाधान मिळते ते बाजारातून भाजी खरेदी करताना कधी च मिळत नाही .

बाबा आणि साधना ताई यांच्या  समाधीचे  दर्शन घेतल्यावर जी भावना निर्माण झाली ती मी शब्दात सांगू शकत नाही.बाबांनी सांगितले होते कि माझे दहन न करता इथेच समाधी बांधावी ,त्यांच्या शेजारीच गेल्या वर्षी साधना ताईची समाधी बांधण्यात आली . पतीच्या कार्यात शेवटपर्यंत साथ देणारी स्त्री !
शेजारीच असलेली गुलाबाची बाग ...सर्व सुंदर ....
आनंदवन ,बनताना एका तून दुसरे असे करत करत बनत गेले ते गाव.
त्यानंतर आम्ही पहिली ती शाळा , आणि त्याच्या बाजूला असलेली निवासस्थाने .. मुलांकरिता व मुलींकरिता .
तिथून समोरच ज्यांचे आई -वडील आनंदवनात कामाकरिता जातात त्यांच्या छोट्या मुलांकरिता असलेले पाळणाघर , आणि इथली तान्ही ते तीन वर्षापर्यंत ची बाळे...

अंध ,अपंग मुलांची निवासी शाळा  पाहून मन थक्क झाले . सर्व गोष्टी एखाद्या सामान्य मुलांप्रमाणे करण्याची जिद्द दिसत होती .ग्रीटींग्स ,कलाकुसर, भिंतीवर लावण्याकरिता चित्रे  हे तर अतिशय कुशलतेने करत होते.त्यांनी त्यांच्यातल्या कमी असलेल्या गोष्टींवर मात केली होती .

तसेच ह्या मुलांचा एक ऑर्केस्ट्रा हि तयार केला आहे, खूप सुंदर आवाजात गाणारी मुले- मुली . व त्या तालावर नाचणाऱ्या मुली सर्व स्तिमित  करणारे होते.

१४ तळी ह्या आनंदवनात तयार केली आहेत , तिथून सर्व ठिकाणी पाणी पुरवले जाते आणि गम्मत म्हणजे संपूर्ण नागपुरात नसले  तरी त्या तळ्यात उन्हाळ्यात हि पाणी राहते....
११ वी व १२ वी करिता college  आहे. जिथे जवळच्या खेड्यातून ,गावातून मुले शिकायला येतात .कृषी -तंत्र महाविद्यालय आहे .
आता एक मोठे स्वयंपाक  घराचे काम सुरु आहे ,जिथे एका वेळेस २००० ते २५०० लोकांचे अन्न एकाच छत्राखाली शिजवले जाईल .

सुतार काम, हातमाग,चर्मकला सर्व विभागांना भेटी दिल्या .हातमागावर विणले जाणारे सतरंजीचे रंग मन मोहून घेत होते .प्लास्टिक पासून उशा ,गाद्या बनवण्याचा एक प्रकल्प हि इथे आहे .
ह्या  जागेसारख सौंदर्य नाही कुठे आणि हे सौंदर्य  निर्माण करणारे लोक ती आहेत ज्यांना समाजाने कुरूप, अछूत अशा अनेक संज्ञा बहाल केल्या होत्या त्यांच्याकडून .......

ह्या सर्व गोष्टींची माहिती देण्याकरिता आमच्या बरोबर प्रभू काका ३४ वर्षापूर्वी कोकणातून इथे बाबांचे कार्य बघायला आले आणि ते इतके प्रभावित झाले कि घरी जावून सांगितले कि मी आता तिथे च राहणार आहे ,व आज ३४ वर्षे ते इथले कार्यकर्ते आहेत . असे अनेक कार्यकर्ते तिथे आहेत , केवळ सामाजिक भावनेतून प्रेरित होवून आपले वेगळे आयुष्य जगात आहेत.
नंतर विकास भाऊ आणि कौस्तुभ या दोघांनी सर्वांशी मनमोकळ्या गप्पा केल्या .प्रकाश आमटे ,साधना ताई यांची काही पुस्तके विकत घेतली , काही कलाकुसरीच्या वस्तू घेतल्या आणि आमचा दिवस संपला .
आयुष्यातला तो एक दिवस मला तर तो दिवस कायम स्मरणात राहील...

26-1-2012