Wednesday, 12 July 2017

आई

गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर , माझा पहिला गुरू हरपण्याची वेळ माझ्यावर आली।
आई या शब्दात सारे विश्व  सामावले असते. 
सुगरण, सुस्वभावी, हसतमुख , प्रेमळ,मुलांची  , नातवंडाची सतत काळजी वाहणारी माझी आई !
घर , स्वयंपाकघर हे च तिचे विश्व ! घरी आलेला पै पाहुणा, कामवाली , watchman, भाजीवाले, पोस्टमन , फळवाला  ह्यांना मायेने खायला घालणे हा तिचा स्वभाव ! वडील असेंस्तोवर त्यांना बाहेर फिरायची हौस , तिने घरात राहून सांभाळली ! परिस्थिती कशी ही असली तरी कोंड्याचा मांडा करणे तिला सहज शक्य होते .  मुलांनी शिकावे ह्याकरता ती आग्रही होती, मुली म्हणून आमच्यावर कधी वेगळी बंधने तिच्याकडून नव्हती, स्वतः ला सर्व गोष्टीत आवड होती , जसे की शिवणकाम , विणकाम , waste पासून बेस्ट बनवणे .रांगोळी वगैरे !
आई तुझ्याकडून मी काही ह्या कला  शिकून पारंगत झाले नाही.
पण तुझ्या कडून एक गोष्ट नक्की शिकले की कोणत्या ही परिस्थितीत हार मानायची नाही !
आई तुला सद्गती लाभो , ही च ईश्वर चरणी प्रार्थना !
तुझी अर्चना !
९/७/२०१७

प्रिय आई,

आज म्हणता म्हणता एक आठवडा झाला तू आमच्यातून जावून. तू गेल्या पासून एकही दिवस असा गेला नाही की तुझी आठवण झाली नाही. सतत तू बसून आमच्याशी बोलते आहेस असा भास होत राहतो. तुला कसला मोठा आजार नव्हता आणी तू एरव्ही पण झोपून कधी राहिली नाहीस. 
अतिश चे जाण्याचे तू कौतुक केले होतेस त्याच प्रमाणे
अदिती  ला जाताना सुध्दा तुला जमेल ते तू तिला करुन दिलेस. तेव्हा साधी पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती की तू सहा महिन्यांत आम्हाला सोडून जाशील.. नीता वहिनी गेली  तेव्हा तू तुझे दुःख बाजूला ठेवलेस आणि सर्वाना सावरायला मदत केलीस. कौस्तुभ च्या पाठीशी तू खंबीरपणे उभी राहिलीस, त्याचे शिक्षण उत्तम रीतीने पूर्ण व्हावे हे एक मिशन , हा च एक ध्यास .
आप्पा गेले  तेव्हा त्यांच्या जाण्याचे दुःख झालेच पण तू होतीस म्हणून त्यांची पोकळी तेवढी जाणवली नाही. पण आता तू गेल्याने मला सावरायला कुणी नाही. आणि जाणवले की आता मायेने डोक्यावर हात ठेवायला कुणी नाही. आपले छप्पर कायमचे गेले. तुझी मांडी नाही आता डोकं ठेवायला.
तुझे जेवण बनवणे म्हणजे खास च! कोणी ही एकदा खाल्ले तरी कायम लक्षात राहील असे ! प्रत्येक गोष्टीची पातेली ठरलेली. त्यात बदल केलेला तुला खपत नसे, अगदी चिमटा सुद्धा दुधाचा वेगळा ! नारळ खवुन ठेवायचा , भाजी आमटीत सढळ पणे घालायचे, आंबट पणाकरिता टोमॅटो , चिंच, कोकम कशात काय घालायचे हे अगदी योग्य ते !
कोणाचा वाढदिवस कधी आहे, ते आठवणीत ठेवून सांगणारी !
अश्या कितीतरी आठवणी मनात दाटून येतात. 

खरं आहे की माणूस जिवंत असताना आपण आपल्या भावना दाखवत नाही पण तुला न बोलताच सारे कळत होते. तू जरी देहाने नसलीस तरी तू कायमच आमच्यात असणार ह्याची खात्री आहे. आमच्या यशात आणि अपयशात आमच्या कायम पाठीशी राहशील. तुझे आशिर्वाद आमच्या पाठीशी राहू देत. 

तुझी लेक
अर्चना 

15/7/17


आज आई ची खूप आठवण येते, तिची दीप पूजा ।
सगळे दिवे आदल्या रात्री काढून घासून पुसून स्वच्छ करून ठेवा, सकाळी त्यात तेल घालून वाती भिजवून ठेवा
मग सर्वांचे करून झाले की शेवटी पाटाभोवती रांगोळी काढून त्यावर ताट ठेवून त्यात सर्व दिवे प्रज्वलित करायचे।
हळद कुंकू फुले अक्षता वाहून दीप पूजन संपन्न होत असे,
नेवैद्य म्हणून गोड काही तरी बहुधा खीर च 
संध्याकाळी परत दीप प्रज्वलन , शुभम करोती म्हणायचे हे आई ची प्रथा !

अर्चना 
23/7/17
श्रावण महिना
संपूर्ण श्रावण महिना केवळ एक वेळेस जेवून कारायचीस, किती वर्षे केलेस , खरच लक्षात नई.
पण जेव्हा पासून लक्षात आहे , तेव्हा तुझे उपास हे च आठवते आहे.
खूप वर्षे अगदी कांदा लसूण सुद्धा आपण खात नसू श्रावणात.




No comments:

Post a Comment