सकाळ झाली कि लगेच च घराबाहेर पळायचे ,भाड्याने सायकल घ्यायची तासभर घुमावायची मग दुसर्या मैत्रिणीबरोबर तिला सायकल आणायची म्हणून तिच्यासोबत जायचे…दुपार होईतोवर अशी मजा …. दुपारी सगळ्याच्या मताने बैठे खेळ ….
सर्व जण कोजागिरीला जागरण करतात , पण आम्ही मात्र वैशाख पौर्णिमेला जागरण करत असू … एक दिवस गच्चीवर जमायचे … प्रत्येकाने घरून खाऊ आणायचा किंवा कधी कधी वर्गणी गोळा करून कच्चे समान आणायचे
मे महिना म्हणजे वाळवण करायचे दिवस … पापडाचे पीठ तयार झाले कि त्याची चव बघण्यापासून ते लाटून , वाळत घालेस्तोवर किती वेळा पोटात जात असेल … आई चा डोळा चुकवून पापडाची लाटी खाण्याची मजा काही और च …. पापडाचे प्रकार तरी किती उडीदाचे , नाचणीचे ,ज्वारीचे ,तांदळाचे …त्यात परत काळेमिरी चे, लाल तिखटाचे , हिरव्या मिरचीचे …. मग साबुदाण्याच्या कुरडया … गव्हाच्या चीकावड्या …. आहा … वेगवेगळ्या प्रकारची लोणची मग त्या बरण्या उन्हात नेवून ठेवायच्या …. न पाडता संध्याकाळी घरात आणून ठेवायच्या …. आता घरी करत नाही पण नुसत्या आठवणीने हि तोंडाला पाणी सुटते ….
मे महिना म्हणजे फळांचा राजा आंबा आणि फणस …त्यांचे दिवस … चैत्राला जी वाटली डाळ आणि कैरीचे पन्हे सुरुवात होते… ती आंबे आले की द्विगुणीत होते …. हपुस्स्स्सस्स्स ,पायरीई …. अशी आरोळी आली की मग झालीच सुरुवात आम रसाची ……. फणसाचे गरे … पोटाला बरे म्हणत फणस खायचा …. उन्हाळा म्हणून ICECANDY आणि ICE -CREAM त्यात हि आंब्याचा स्वाद घ्यायचा ….मे महिना म्हणजे लग्नाचे दिवस मग कोणा मावशी -मामाचे लग्न असले की नटून -थटून लग्नात मिरवायचे …. मध्ये च कोणी तरी विचारणार मला ओळखतेस का ? आठवत नसले तरी हो म्हणायचे आणि हसायचे …. गम्मत म्हणजे कधी तरी वर्ष दोन वर्षातून भेटणारी एवढे नातेवाईक कसे बरे आठवणार ? पण तसे म्हटले तर परत सगळी इथली तिथली नाती सांगणार … …. त्या पेक्षा हो म्हणणे श्रेयस्कर …. पटकन पळता येत असे …. तेव्हा देखील जेवणापेक्षा संध्याकाळचे ICE -CREAM खास आवडीचे …
अशी गमतीजमती करत दीड महिन्याची सुट्टी किती पटकन संपली असे वाटत शाळा सुरु व्हायची ……
आता जरी सुट्टी असली तरी ही मजा नसते पण मनात मात्र ह्याच आठवणी ताज्या होवून जातात ….
पूर्व प्रसिद्धी या सख्यानो या ई- अंक मे २०१३
No comments:
Post a Comment