Monday, 17 June 2013

आठवणीतला मे महिना !

मे महिन्याचा महिमा
माझा जन्म मुंबईतला ,सारे बालपण मुंबईतच , आजोळ हि मुंबईतच …आजोळी राहायला कधी फारसे गेल्याचे आठवतदेखील नाही . त्यावेळेस असे वाटायचे की मुंबईतच असल्याने नाही जात राहायला , दुःख नव्हते कशाचे .  त्यामुळे मे महिना म्हटले की फक्त डोळ्यासमोर यायची ती शाळेला सुट्टी …
मे महिना म्हणजे उन्हाळा असे कधी वाटले नाही, कारण मुंबईत पावसाचे दोन महिने सोडले कि कायम उन्हाळाच ….  मे महिन्याची सुट्टी म्हणजे धमाल ,मस्ती, मजा …
सकाळ झाली कि लगेच च घराबाहेर पळायचे  ,भाड्याने सायकल घ्यायची तासभर घुमावायची मग दुसर्या मैत्रिणीबरोबर तिला सायकल आणायची  म्हणून तिच्यासोबत जायचे…दुपार  होईतोवर अशी मजा …. दुपारी सगळ्याच्या मताने बैठे खेळ ….  संध्याकाळी विटीदांडू ,लपाछापी ,चोर पोलीस , लगोरी., डबा ऐसपैस .. असे  खेळ खेळत आईने किमान दहा वेळेस हाका मारल्यानंतरच घरी जायचे …. अभ्यासाची घाई नाही की गृहपाठ झाला नाही ह्याचा ओरडा नाही … 
सर्व जण  कोजागिरीला जागरण करतात , पण आम्ही मात्र वैशाख पौर्णिमेला जागरण करत असू … एक दिवस गच्चीवर जमायचे … प्रत्येकाने घरून खाऊ आणायचा किंवा  कधी कधी वर्गणी गोळा करून कच्चे समान आणायचे आणि गच्चीतच भेळ  बनवायची …. गोड म्हणून कोणाच्या तरी घरून खाऊ यायचा …. गाण्याच्या भेंड्या , कानगोष्टी असे खेळ खेळायचे…
मे महिना म्हणजे वाळवण करायचे दिवस … पापडाचे पीठ तयार झाले कि त्याची चव बघण्यापासून ते लाटून , वाळत घालेस्तोवर किती वेळा पोटात जात असेल … आई चा डोळा चुकवून पापडाची लाटी खाण्याची मजा काही और च …. पापडाचे  प्रकार तरी किती उडीदाचे , नाचणीचे ,ज्वारीचे ,तांदळाचे …त्यात परत काळेमिरी चे, लाल तिखटाचे , हिरव्या मिरचीचे …. मग साबुदाण्याच्या कुरडया … गव्हाच्या चीकावड्या …. आहा … वेगवेगळ्या प्रकारची लोणची मग त्या बरण्या  उन्हात नेवून ठेवायच्या …. न पाडता संध्याकाळी घरात आणून ठेवायच्या …. आता घरी करत नाही पण नुसत्या आठवणीने हि तोंडाला पाणी सुटते ….
मे महिना म्हणजे फळांचा राजा आंबा आणि फणस …त्यांचे  दिवस … चैत्राला जी वाटली डाळ  आणि कैरीचे पन्हे सुरुवात होते… ती आंबे आले की द्विगुणीत होते …. हपुस्स्स्सस्स्स ,पायरीई ….  अशी आरोळी आली की मग झालीच सुरुवात आम रसाची ……. फणसाचे गरे … पोटाला बरे म्हणत फणस खायचा …. उन्हाळा म्हणून ICECANDY  आणि ICE -CREAM त्यात हि आंब्याचा स्वाद घ्यायचा …. 
मे महिना म्हणजे लग्नाचे दिवस  मग कोणा मावशी -मामाचे लग्न असले की नटून -थटून लग्नात मिरवायचे …. मध्ये च कोणी तरी विचारणार मला ओळखतेस का ? आठवत नसले तरी हो म्हणायचे आणि हसायचे …. गम्मत म्हणजे कधी तरी वर्ष दोन वर्षातून भेटणारी एवढे  नातेवाईक कसे बरे आठवणार ? पण तसे म्हटले तर परत सगळी इथली तिथली नाती सांगणार … …. त्या पेक्षा हो म्हणणे श्रेयस्कर …. पटकन पळता येत असे …. तेव्हा देखील जेवणापेक्षा संध्याकाळचे ICE -CREAM  खास आवडीचे …
अशी गमतीजमती करत दीड महिन्याची सुट्टी किती पटकन संपली असे वाटत शाळा सुरु व्हायची ……

आता जरी सुट्टी असली तरी ही मजा नसते पण मनात मात्र ह्याच आठवणी ताज्या होवून जातात ….



पूर्व प्रसिद्धी या सख्यानो या ई- अंक मे २०१३

No comments:

Post a Comment